Sunday, March 12, 2017

मरासिम

मरासिम 

अजून पण ती रात्रं लख्ख आठवतोय मला. बाबांनी walkman  घेतला होता. आणि त्याच दुकानातून जगजीत सिंग ची एक कॅस्सेट. दुकानातून बाहेर पडल्या पडल्या मी त्यांच्या हातातून walkman काढून घेतला होता. इअर प्लग कानात सारून मी प्ले चं बटण दाबलं. गिटार ची जीवघेणी सुरावट कानातून सरळ मेंदूत घुसली होती. पाठोपाठ जगजीत सिंग चा आवाज मनात हळूच शिरला.
कोई ये कैसे बतायें के वो तनहा क्यू है. 
त्या वेळेला शब्द समजले नाहीत. पण काहीतरी लक्कन हललं  होतं आतपर्यंत. मुळात उर्दू हि भाषाच तशी आहे. प्रियकराने प्रेयसीबद्दल बोलावे तर फक्त उर्दूमधूनच हा माझा ग्रह आजतागायत कायम आहे. असे सुंदर शब्द कि बोलताना सुद्धा एक नाजूक भाव मनात जागृत व्हावा.त्यात जगजीत सिंग चा आवाज म्हणजे सतारीची तार फुलांनी छेडली गेल्याचा अनुभव यावा. 
कोई ये कैसे बतायें के वो तनहा क्यू है 
कुणी कसं  सांगावं कि एकाकी का वाटतंय ते. माणसांच्या या गर्दीत एकटेपणा हरवून जातो असं वाटतं खरं. पण तसं नसतंच मुळी. आजूबाजूला खूप लोक असतानासुद्धा मन एकटं पडतं . कारण माहीत असतं स्वतःला पण त्यावर विश्वास ठेवण्याची हिम्मत नसते आपल्यात. पण शेवटी मनातलं ओठांवर येतंच.
वो जो अपना था वही और किसीका क्यूँ है
आणि मग बांध फुटून जातो. इतके दिवस जी तक्रार मनात साचून होती ती बाहेर पडते.
यही  दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यों है
याही होता है तो आखिर यही  होता क्यो है
लोक म्हणतात कि हे जग असंच आहे आणि इथे असंच होतं. अरे पण का असं होतं आणि जर हे जग असंच असेल तर मुळात हे जगंच असं का आहे.


एक जरा हाथ बढा  दे तो पकडले दामन 
उसके सीने मी समा जाये हमारी धडकन

ऐन पावसाळ्यातला माळशेज घाट. बाकीचे मित्र मैत्रिणी इथे तिथे पांगलेत. मस्त हिरव्यागार धुक्यात ती आणि मी दोघे चाललोय. एका जलाशयाच्या काठच्या दगडावर जागा बघून आम्ही दोघे बसतो. त्या पाण्यावर पण धुक्याचा हलकासा तवंग पसरलाय. अचानक ते धुकं दाट होऊन आमच्या अवतीभोवती पसरतं. दुरून पावसाचा आवाज ऐकू येतो. मंजुळ पाय वाजवत तो पाऊस हलकेच जवळ येऊन आम्हाला मिठीत घेतो. त्या गर्द धुक्याच्या मिठीमध्ये मी, ती, तो नाजूक जलाशय आणि फक्त आमच्या करता पडत असलेला पाऊस. ती माझ्या जवळ आहे आणि नाही. एकमेकांच्या हृदयाची धडधड त्या पावसाच्या आवाजात मिसळून गेली आहे. आठवणींच्या कुपीतून त्या क्षणाचा गंध अजून दरवळतोय मनात. आज इतक्या वर्षांनी हे लिहिताना सुद्धा काटा फुललाय अंगावर आणि जगजीतचा आवाज हलकेच हृदयात मिसळतोय.
इतनी कुर्र्बत है तो फिर 
फासला इतना क्यूँ है 

एवढी जवळीक असून पण हा अंतराय कसला.



दिल-ए-बरबाद से निकला नही अब तक कोई 
एक लुटे घर पे दिया करता है दस्तक कोई 

अजून त्या दुःखातून सावरलो नाही मी. त्या जुन्या जखमेवर कोण फुंकर घालतोय कळत नाही.

आस जो टूट गयी 
फिर से बंधाता क्यूँ है 

आस तर कधीच सोडून दिली होती मी. मग आता मनाला उभारी कोण देतंय आणि का ?


तुम मसर्रत कहो या इसे  गम का रिश्ता
केहते है प्यार का रिश्ता है जनम का रिश्ता

या नात्याला दुःखाचं नातं म्हणा किंवा आनंदाचं. ज्या नात्याला काही नाव नव्हतंच त्याला नाव देण्याचा अट्टाहास का ? जे तिचं आणि माझं होतं ते फक्त आमचं होतं. जन्मभराची असतात हि नाती.

 है जनम का जो ये रिश्ता 
तो बदलता क्यूँ है


आणि जर जन्मभराची असतात तर का बदलतात हि नाती. उर्दू मध्ये मारासीम म्हणजे तक्रार. कैफी आझमीची हि मरासिम माझी असेल किंवा जर भाग्यवान असाल तर तुमचीही. पण ज्याच्या काळजाला अशी मुलायम जखम असते ते खरे नशीबवान. आणि जर जगजीतचा मखमली आवाज तुमच्या काळजाच्या तारा छेडत तुम्हाला गोंजारत असेल तर तुमच्यासारखे पुण्यवान तुम्हीच.

No comments:

Post a Comment